चरित्र
प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.
प्रकरण ८: मुळकीच्या डोंगरावर जामसप्ताह साजरा
"करील ते काय नोहे महाराज" (तु. म.)
पंचाग्नी विधीची साधना पूर्ण झाल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराज नेर्ले गावाच्या पश्चिमेस असलेल्या मुळकीच्या डोंगरावर जामसप्ताह साजरा करण्यासाठी आले.
सप्ताहाच्या समाप्तीप्रसंगी खिरीचा प्रसाद करण्यात आला होता. या प्रसादासाठी लागणारी मोठी काहील बालदास महाराजांनी नेर्ले गावातून स्वतःच्या डोक्यावर उचलून मुळकीच्या डोंगरावर नेली होती. त्यांची ती अपार ताकद पाहून जमलेला भक्तगण अचंबित झाला.
खिरीचा प्रसाद उपस्थित सर्व भक्तांना पोटभर वाढण्यात आला. हजारो लोकांनी तो प्रसाद अत्यंत आनंदाने व तृप्त मनाने ग्रहण केला. जमलेल्या भक्तांची संख्या इतकी प्रचंड होती की आणलेल्या पत्रावळ्या अपुऱ्या पडल्या. अखेरीस काही भक्तांना दगडावरच खिरीचा प्रसाद वाढण्यात आला.
तेथे असलेल्या जांभा दगडावर भक्तांनी तो प्रसाद ग्रहण केला. जांभा दगडालाच पात्र मानून भक्तांनी श्रद्धेने प्रसाद घेतला. एवढ्या मोठ्या जनसमुदायाला खीर वाटूनही प्रसाद अजिबात कमी पडला नाही.
उरलेली खीर बालदास महाराजांनी स्वतः बैलाची गाडी जुंपून कृष्णा नदीच्या ढोहात ओतली. त्या खिरीच्या प्रसादाचा लाभ कृष्णा नदीतील मासे व इतर जलचर प्राण्यांनीही घेतला.