चरित्र
प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.
प्रकरण ६: अनुग्रह
"मग श्रीगुरु आपैसा | भेटेची गा" (ज्ञा. मा.)
सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी बालदास महाराजांची चांगलीच परीक्षा घेतली होती. चाळीस गाई आणि चार बैल सांभाळणारा हा आमचा खरा भक्त आहे. गोरक्षणाचे काम बालदास महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे. अशा श्रद्धावान भक्ताला आपण आपल्या जवळ करून घ्यावे, असे सद्गुरु नेर्लेकर महाराजांना वाटले.
सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या मनात जे जे आले, ते त्यांनी प्रत्यक्षात आणले. त्यांनी सौते गावी असणाऱ्या आमच्या बालदास महाराजांना दृष्टांत देऊन नेर्ले या गावी बोलावले. नेर्ले हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. दुसऱ्या दिवशी महाराज पायीच चालत नेर्ले गावी पोहोचले.
बालदास महाराज पायी चालत आलेले पाहून सद्गुरु नेर्लेकर महाराज म्हणाले,
“अरे बाळू, तू इतक्या लवकर कसा काय आलास?”
बालदास महाराज चेहऱ्यावर स्मितहास्य प्रकट करून म्हणाले,
“आपण दृष्टांत दिला, म्हणून लवकर येणं भाग पडलं.”
हे ऐकून सद्गुरूंनी मान हलवली, हातवारे करत म्हणाले,
“अरे बाबा, कळले… आता कळले मला.”
बालदास महाराज सद्गुरूंच्या चरणाजवळ बसून नमस्कार करून म्हणाले,
“आपली काय आज्ञा आहे?”
सद्गुरु म्हणाले,
“तुला मी अनुग्रह देणार आहे.”
हे शब्द ऐकताच बालदास महाराजांना विलक्षण समाधान वाटले. त्यांची सारी गात्रे प्रफुल्लित झाली. आनंदाने त्यांच्या अंगावर शहारे आले. उमललेल्या फुलासारखा हसरा चेहरा करून बालदास महाराज म्हणाले,
“आज मला अनुग्रह हवाच आहे. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो, चकोर पक्षी जसा चांदण्याची वाट पाहतो, तशीच मी आपल्या उपदेशाची वाट पाहत होतो. आपण मला अनुग्रह द्यावा.”
सद्गुरु म्हणाले,
“अरे बाबा, हा अनुग्रह कुणालाही देता येत नाही. हा अनुग्रह घेण्यासाठी ती व्यक्ती सर्वार्थाने पात्र असावी लागते. आमचे सोन्यासारखे शब्द जर कुंपणात फेकले, तर त्यांचा उपयोग काय? आता तुझी आध्यात्मिक ज्ञानाची बैठक तयार झाली आहे. तू माझ्या श्रद्धेला पात्र ठरलास. हीच वेळ तुला अनुग्रह देण्याची आहे. आता विलंब करता येणार नाही.”
नेर्ले गावच्या मठात सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी बालदास महाराजांना अनुग्रह दिला. अनुग्रह झाल्यानंतर बालदास महाराज काही दिवस तेथेच आपल्या सद्गुरुंच्या सहवासात राहिले. सद्गुरुंनी त्यांना भरपूर उपदेश केला. गुरु-शिष्यांमध्ये परमार्थासंबंधी सखोल चर्चा झाली. विशेषतः सामान्य माणसाने संसार करत असतानाही परमात्मा कसा साध्य करावा, याचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला.
अनुग्रह घेतल्यानंतर बालदास महाराजांची मुद्रा आनंदित झाली होती.
“मला मोगऱ्याचा वास भेटला, मला मोगऱ्याची संगत लाभली,” असे महाराज सर्वांना सांगू लागले.
“मला परमेश्वर भेटला. माझ्या चित्तातील आनंद फुलवणारा देव मला भेटला. मला ज्ञानाच्या महासागरात डुबकी मारायला मिळाली,” अशा अंतःकरणातून उमटणाऱ्या ललकाऱ्यांद्वारे बालदास महाराज हे अनुभव इतरांना सांगू लागले.