चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण ४: सद्गुरु नेर्लेकर महाराजांचे सौते गावी आगमन

प्रकरण ४: सद्गुरु नेर्लेकर महाराजांचे सौते गावी आगमन

"उद्घागया आले ठिण जना" (ना. म.)

परमपूज्य जंगली महाराजांचे शिष्य सद्गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर हे गाईंचा कळप घेऊन वारणेच्या काठावरील गावे आपल्या व गाईंच्या पायांनी पावन करीत करीत एके दिवशी सौते गावी आले. नेर्लेकर महाराज गावात आल्याची वार्ता क्षणार्धात सर्वत्र पसरली—
“नेर्लेकर महाराज आलेत!”

गावात आल्यानंतर सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी गावाला उपदेश केला. त्यांच्या उपदेशाने सारा गाव भारावून गेला. सर्वत्र सद्गुरु नेर्लेकर महाराजांचा जयजयकार होऊ लागला. या प्रसंगाला आमचे बालदास महाराजही अपवाद ठरले नाहीत. तेही या मेळाव्यात सहभागी झाले. हनुमानाच्या देवळातून बाहेर पडून बालदास महाराज सद्गुरु श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांच्या समवेत संपूर्ण गावभर फिरू लागले.

चुकलेल्या मुलाला आई भेटल्यावर जो आनंद होतो, तोच आनंद सद्गुरु नेर्लेकर महाराजांना भेटल्यावर बालदास महाराजांना झाला. सद्गुरुंच्या सहवासात ते पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.

सारा सौते गाव सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या पाठीमागे का लागला, या प्रश्नाचे उत्तर भक्तांनी ऐकले तर त्यांच्या अंतःकरणात खरोखर आनंद निर्माण होईल. तो आनंद मिळावा म्हणूनच येथे घडलेली ही सत्यकथा सांगत आहे.

त्या काळी सौते गाव कर्जाने गांजले होते. सारे लोक दुःखी व कष्टी होते. लोकांच्या विहिरींना पाणी नव्हते. उन्हाळ्यात तर पाण्याची फारच टंचाई भासत असे. गावाचे हे दुःख पाहून सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी साऱ्या गावाला तीन दिवसांचा उपवास सांगितला. गावात तराळाद्वारे दवंडी दिली गेली—

“ऐका हो ऐका! बाबांनो, आपल्या गावाचं भलं होण्यासाठी साऱ्या लोकांनी आपापल्या जनावरांसह तीन दिवस उपवास करावा. हो बाबा, हो!”

साऱ्या सौते गावातील बायका-पोरांनी उपवास केला. पुरुषांनी आपली जनावरेही उपवाशी ठेवली. एवढेच नव्हे, तर त्या दिवशी गाईला वासरू सुद्धा पाजले गेले नाही. एवढा खडतर उपवास साऱ्या सौते गावाने पाळला.

या उपवासाचा परिणाम असा झाला की पुढील वर्षभरात गाव सुखी झाले. सारा गाव कर्जमुक्त बनला. लोकांच्या विहिरींना पाणी लागले. संपूर्ण शिवार हिरवागार पिकांनी डोलू लागले. सद्गुरु नेर्लेकर महाराज त्या गावात आले आणि जाताना काहीतरी देऊन गेले—ही गोष्ट मात्र नक्की. ही सत्यघटना आजही गावातील म्हातारे लोक सांगतात.

अशा या सद्गुरुंचा प्रभाव बालदास महाराजांवर पडल्याशिवाय राहिला नाही. म्हणूनच या प्रकरणात “सारा सौते गाव सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या पाठीमागे लागला” असा उल्लेख केलेला आहे.

ज्यावेळी सारा समाज संकटात सापडतो, त्यावेळी कुणी ना कुणी ज्ञानी पुरुष समाजात अवतरतो. तो समाजाचे दुःख नाहीसे करतो आणि अशा वेळी सारा समाज त्या ज्ञानी पुरुषाच्या मागे धावतो. हा ज्ञानी पुरुष म्हणजेच तेजाचा तारा होय.

सौते गावाला कर्जाच्या संकटातून वाचवण्याचे महान कार्य सद्गुरु नेर्लेकर महाराजांनी केले. दुःखी गावाला सुखाचे दिवस आले. सारा गाव भक्तीमार्गाकडे वळला. या साऱ्या गोष्टींचे कारण म्हणजे सद्गुरु नेर्लेकर महाराज हे त्या गावासाठी तेजस्वी ताऱ्याच्या रूपाने अवतरले.

असे तेजाचे तारे महाराष्ट्राच्या भूमीत अनेकदा अवतरले आहेत. उदाहरणार्थ—समाज वाईट आचार-विचारांच्या अधीन जात असताना पूज्य ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला वाचवले. त्यांनी वाईट आचारकांडाविरुद्ध बंड पुकारले आणि समाजाला वाईट रूढी, वाईट परंपरा व चुकीच्या चालीरीतींपासून मुक्त केले. म्हणजेच समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊली अवतरली.

सारांश असा की, सद्गुरु नेर्लेकर महाराजांच्या आगमनामुळे सौते गाव संकटमुक्त झाले. अशा अवतारी पुरुषाचा प्रभाव बालदास महाराजांच्या मनावर पडणे हे स्वाभाविकच होते.