चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण १९: उपदेशसार

प्रकरण १९: उपदेशसार

“अनुभवे आले अंगा | ते या जगा ठेतमे ॥” (तु. म.)

बालदास महाराजांचा उपदेश भाविकांना अमृतासारखा गोड वाटायचा. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, अभंगगाथा यांचा महाराजांनी विशेष अभ्यास केला होता. याशिवाय एकनाथी रामायण, भक्तिविजय, हरिविजय, पांडवप्रताप इ. धार्मिक ग्रंथांचेही ते मनोमन वाचन करत.

महाराजांचा उपदेश लांबलचक किंवा अवघड शब्दांत नसून सोपा, सहज समजणारा होता. भोवती बसलेल्या लोकांना सहजतेने ज्ञानाचा प्रवाह देत. भक्तांनी प्रश्न विचारले तर समाधान होईपर्यंत महाराज उत्तरांची सरबत्ती चालू ठेवत.

भोवती जमा झालेल्या समाजाला ते म्हणत,
“अरे बाबांनो! परमेश्वर आपलासा करावा. त्याच्यावर श्रद्धा ठेवा. मनभावना नसल्यास देव मिळणार नाही. देवाचं महत्त्व भाजीपाल्यासारखं समजू नका. परमेश्वर प्राप्त करण्यासाठी मन शुद्ध असणे आवश्यक आहे. ज्या साधना केल्या जातात त्यांचा उद्देश मन शुद्ध करणे हा असतो. तुमचे मन पाक करा, तर परमेश्वर तुमच्यासोबत असेल.”

ते पुढे म्हणाले,
“माणसानं आपली कार्यसिद्धी होण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न महत्त्वाचे आहेत. फक्त कामाची जबाबदारी देवावर सोपवून चालत नाही. म्हणून म्हणतात — ‘प्रयत्नांती परमेश्वर।’”

एकदा महाराज एका खेड्यात गेले. तेथे गुरुंच्या प्रतिमेची स्थापना होती. कार्यक्रमात उपस्थित लोकांनी विचारले,
“महाराज, अंतरात्मा म्हणजे काय?”
महाराज म्हणाले,

“सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंतरात्मा एकच आहे. सकळ चालिका एक, अंतरात्मा वर्तवी अनेक; मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत ते चालते.” (१०,१०,३५)

दासबोधात अंतरात्म्याचे वर्णन असं आहे:
“तो कळतो पण दिसत नाही; प्रचिती येते पण भासत नाही. प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात असूनही एके ठिकाणीच नाही, तर सर्वत्र सामावलेला आहे. वायूहूनही तो चपळ आहे, दृष्टीनी तो पाहतो, कानानी ऐकतो; जीभ, नाक, त्वचा या इंद्रियांच्या क्रियाही तोच अंतरात्मा अनुभवतो.”

दासबोधातील काही श्लोक:

“पृथ्वीमध्ये जितुके शरीरे | तितुकी भगवंताची घरे” (२०,४४)

“देऊळ म्हणजे नाना शरीरे | येथे राहिजे जीवेश्वरे” (१७,१,१३)

“चालती बोलती देऊळे | त्यात राहिजे राऊळे” (१७,१,१४)

“नारायण असे विश्वी | त्याची पूजा करीत जावी” (१५,९,२५)

महाराजांनी स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीचे शरीर म्हणजे एक देऊळ आहे. त्या देऊळातील भगवंत म्हणजे अंतरात्मा. त्याच्या सुखासाठी शरीराने, मनाने झिजणे हीच अंतरात्म्याची उपासना होय. व्यवहारात यालाच “समाजसेवा” म्हणतात. ही समाजांतर्गत उपासना जगभरात सर्वत्र देवच देव दिसायला लावते. उपासना कधीही, कोठेही, कोणत्याही परिस्थितीत करता येते.

महाराज पुढे म्हणाले,

“उपासना केल्याशिवाय जय होत नाही. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेवीण निराश्रयो; उदंड केले तरी जयो, प्राप्ती नाही.” (१६,१०,२९)

अंतरात्म्याची उपासना आणि भजन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. नरदेहाचे महत्त्व देखील त्यांनी स्पष्ट केले. माणसाने आपला देह परोपकारार्थ झिजवावा; नरदेह परमेश्वराचे वासस्थान आहे.

“आपण स्वंये तरले | जगांसहि उपेगा आले”

असा दुहेरी उपयोग आहे. आयुष्य हे अमूल्य रत्नांनी भरलेली पेटी आहे. भक्‍ती, सेवा, त्याग, उपासना या बहुमोल रत्नांची भर करावी व त्यापासून लाभलेला आनंद जन्मभर अनुभवावा. विषयांच्या सेवनात हा नरदेह व्यर्थ न गमावता, प्रत्येक क्षण देवासाठी खर्चावा.

“देह म्हणजेच मी” अशी देहबुद्धी माणसात नसावी. पण देहाचा यथायोग्य वापर करून स्वतःसह समाज आणि देशाचा उत्थान साधावा.

महाराजांचा उपदेश:

  • भक्तीने देव साधता येतो; पूजा साहित्य आवश्यक नाही.
  • कामातून किंवा मोकळ्या वेळेत देवाच्या नामस्मरणात वेळ घालवावा.
  • आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य; व्यर्थ वाया जाऊ नये.
  • वाईट संगती, आळस, दुर्व्यसन यांत वेळ गमावू नये.