चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण १५: सौते मठात इतर मूर्तींची स्थापना

प्रकरण १५: सौते मठात इतर मूर्तींची स्थापना

“ठेव भाग्ये घरा । येती संपत्ती त्या सकळा ॥” (तु. म.)

सौते गावचा मठ बालदास महाराजांनी आपल्या सद्गुरूंची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित करून पावन केला. अनेक हजार रुपये खर्च करून गुरूंची मूर्ती बसविल्यानंतर महाराजांचे मन अत्यंत शांत झाले. सौते मठात दररोज भजन-पूजन नियमितपणे होऊ लागले. गुरूंच्या मस्तकावर पंचामृताचा अभिषेक दररोज विधीपूर्वक घडू लागला. त्या अभिषेकाच्या वेळी बालदास महाराज अंतःकरणाने तृप्त होत. त्यांना असे वाटे, जणू काही आपले सद्गुरूच तो अभिषेक प्रत्यक्ष स्वीकारत आहेत.

गुरूंच्या समोर नित्यनियमाने फुलांचा आणि सुगंधी द्रव्यांचा वर्षाव होऊ लागला. अनेक स्त्री-पुरुष भक्तांनी गुरूंच्या चरणी फळे-फुले अर्पण केली. अक्षरशः फळा-फुलांचा पाऊस पडत असे. फळे-फुलांचे ढीग महाराजांच्या समोर साचू लागले.

गुरूंच्या मूर्तीच्या स्थापनेनंतर बालदास महाराजांनी सौते गावच्या मठात आणखी अनेक देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या. या सर्व मूर्ती संगमरवरी आहेत. यांपैकी श्री विष्णू, लक्ष्मण, राम, सीता, विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्ती मुख्य गाभाऱ्यात आहेत. तसेच श्री दत्तगुरू, हनुमान, गरुड, शंकर, गणपती व सरस्वती यांच्या मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत.

या सर्व संगमरवरी मूर्तींवर स्वतंत्र अशी लहान-लहान देवळे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक देवळ्याला स्वतंत्र दार आहे. मुख्य गाभाऱ्याच्या समोर या मूर्ती गाभाऱ्याकडे तोंड करून उभ्या आहेत. त्यामुळे असे भासते की सर्व देवतांच्या सान्निध्यात बालदास महाराजांचे सद्गुरू जणू ध्यानमग्न अवस्थेत विराजमान झाले आहेत. देवांच्या या पवित्र मेळाव्यात आपला देव-गुरू पाहून महाराज अत्यंत समाधानी होत.

“मी माझ्या देवाला देव्हाऱ्यात एकटा ठेवलेला नाही, तर सर्व देवांच्या समवेत अधिष्ठित केले आहे,”
असे बालदास महाराज कधी कधी भक्तांना सहजपणे सांगत.