चरित्र
प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.
प्रकरण १४: श्री गुरु मूर्ती स्थापना
“ब्रह्ममूर्ती संत” (ना. म.)
सौते गावच्या मठाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बालदास महाराजांनी त्या मठात प्रथम आपल्या सद्गुरूंची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा संकल्प केला. या संदर्भात त्यांनी आपल्या एका आवडत्या भक्ताला विचारले,
“मी मठात माझ्या गुरूंची मूर्ती बसविण्याचा विचार केला आहे.”
हे ऐकताच आनंदी मुद्रेने तो भक्त म्हणाला,
“फारच छान! पण आपण मूर्ती कशाची बसवणार?”
“म्हणजे तुला काय विचारायचं आहे?” असे महाराजांनी शांतपणे विचारले. भक्ताला क्षणभर वाटले की महाराजांना राग आला की काय, म्हणून त्याने हात जोडून नम्रपणे विचारले,
“आपण जी गुरूंची मूर्ती बसवणार, ती कोणत्या प्रकारची असणार? म्हणजे गारेची, शाडूची, दगडाची की संगमरवरी?”
त्यावर महाराज म्हणाले,
“राजस्थानला जाऊन संगमरवरी मूर्ती आणण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी थोडी पैशांची जमवाजमव करावी लागेल.”
हे ऐकून आवडता भक्त म्हणाला,
“आपण मागाल ते आम्हा भक्तांकडे मिळेल. तुमच्या शब्दासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग करू. आपण याची काहीच चिंता करू नका.”
महाराज म्हणाले,
“ठीक आहे. मग कधी जाऊया?”
“आपण सांगाल तेव्हा.”
“आणि मूर्ती कुठून आणायची?”
महाराज हसून म्हणाले,
“अरे बाबा, ते तर मी आत्ताच सांगितलं. वाटतंय तुझ्या मनात पैशांचाच विचार सुरू आहे, म्हणून मूळ मुद्दाच विसरलास.”
भक्त लाजत म्हणाला,
“हो महाराज, आपलंच बरोबर आहे. संगमरवरी मूर्ती म्हणजे कितीतरी हजारांचा प्रश्न. म्हणून मी विचार करत होतो की किती पैसे बरोबर घ्यावेत.”
महाराज हसत म्हणाले,
“अरे, तुला जेवढे जमवता येतील तेवढे घे. उरलेल्या पैशांची चिंता करू नकोस. देवाच्या मूर्तीबाबत माणसाने चिंता कशाला करायची?”
हे ऐकून भक्ताला मोठा आधार वाटला. जाण्याचा दिवस गुरुवार ठरला. महाराज मूर्ती आणण्यासाठी मठातून बाहेर पडले. मठातून बाहेर पडताच दोन भारद्वाज पक्ष्यांनी त्यांना दर्शन दिले. एकामागोमाग एक असे ते दोन्ही पक्षी उड्डाण करून रस्त्याच्या दुतर्फा निघून गेले.
महाराज भक्ताला म्हणाले,
“बघितलेस का हे पक्षी? देवाने आपल्या स्वागतासाठीच त्यांना पाठवले असावेत. आपण मठातून बाहेर पडताच देवाने त्यांना आज्ञा दिली असावी.”
त्यावर भक्त आनंदाने म्हणाला,
“आपल्या हिंदू संस्कृतीत भारद्वाज पक्षी (कुक्कुट कोंबडा) शुभशकुन मानला जातो. आपला प्रवास नक्कीच यशस्वी होईल.”
महाराज हसून म्हणाले,
“अरे वेड्या, देवाच्या कामाला कधी अडथळा येत नसतो. आणि आला तरी देव त्यावर समर्थ असतोच.”
अशा प्रकारचे संभाषण होत असतानाच महाराज भक्तांसह मलकापूर येथे आले. तेथे आणखी काही भक्त त्यांच्या सोबत जाण्यास तयार झाले. अशा भक्तांच्या गोतावळ्यासह महाराज राजस्थानकडे निघाले.
कोल्हापूर येथे पोहोचताच एक अज्ञात भक्त महाराजांच्या दर्शनासाठी आला. महाराजांनी त्याला आपल्या कुंचकीतून प्रसाद दिला. त्या भक्ताने महाराजांच्या हातात नोटांचे एक बंडल दिले आणि म्हणाला,
“मूर्ती ठरवताना मोजा,”
असे सांगून तो अज्ञात भक्त निघून गेला.
ही घटना महाराजांनी कुणालाही सांगितली नाही. नोटांचे बंडल त्यांनी शांतपणे आपल्या कुंचकीत ठेवले आणि पुढील प्रवास सुरू केला.
तीन दिवसांनी महाराज राजस्थान येथे पोहोचले. तेथे त्यांनी अनेक मूर्तिकारांची भेट घेतली. अखेर अस्सल दर्जाचा एक कलाकार शोधून काढला. त्याला महाराज म्हणाले,
“बाबा, तू माझ्या गुरूंची मूर्ती तयार करून दे. चांगल्या संगमरवराची, तेजस्वी आणि जिवंतपणा असलेली मूर्ती तूच बनवावी, असे मला वाटते.”
मूर्तिकाराने महाराजांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहिले. क्षणभर थांबून तो म्हणाला,
“आपला शब्द मी झेलतो, पण यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल.”
महाराज म्हणाले,
“चालेल, पण मूर्ती गुरूंच्या फोटोसारखीच असली पाहिजे.”
मूर्तिकार म्हणाला,
“अॅडव्हान्स म्हणून दोन हप्त्यांत रक्कम द्यावी लागेल. करारनामा मी करून देईन.”
भक्तांकडे पाहत महाराज म्हणाले,
“सर्व अटी मान्य. पण एकच विनंती आहे—मला ही मूर्ती शक्य तितक्या लवकर हवी आहे.”
मूर्तिकाराने विचारले,
“एवढी घाई का महाराज?”
महाराज भावुक होत म्हणाले,
“ज्या लेकराची आई कायमची या जगातून निघून गेली आहे, ती आई जर त्याला पुन्हा मूर्तिरूपात दिसली, तर त्या लेकराला जो आनंद होईल, तोच आनंद मला माझ्या सद्गुरूंची मूर्ती पाहिल्यावर सदैव मिळणार आहे. त्या आनंदासाठीच मी आतुर झालो आहे.”
मूर्तिकार म्हणाला,
“महाराज, आपल्या भावना मला समजल्या. मी तसा प्रयत्न नक्की करीन.”
अॅडव्हान्स रक्कम देऊन करारनामा झाला. महाराजांनी सद्गुरूंचा फोटो मूर्तिकाराकडे सुपूर्द केला. चहापान झाले आणि महाराज भक्तांसह सौते गावच्या मठाकडे परतले.