चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण १२: महाराजांचा अन्नत्याग

प्रकरण १२: महाराजांचा अन्नत्याग

“विवेकासहित वैराग्याचे बळ | धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा ||” (तु. म.)

कापशी येथे असतानाच महाराजांनी अन्नत्यागाचा निश्चय केला. आपण अन्न न घेताही जगू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना दाखवून दिले. कापशी येथे घेतलेला अन्नत्यागाचा संकल्प त्यांनी देह ठेवेतपर्यंत अखंडपणे पाळला. यावरून त्यांच्या स्वभावातील दृढता आणि त्यांच्या अद्भुत सामर्थ्याची स्पष्ट प्रचीती येते. हे सामान्य माणसाचे काम नव्हे; त्यासाठी असामान्य आत्मबळ आणि तपश्चर्या आवश्यक असते, असेच म्हणावे लागेल.

बालदास महाराज अन्न ग्रहण करत नसत. मग ते काय घेत असत, असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. महाराज फक्त लिंबाचा पाला, निगडीचा पाला तसेच इतर झाडांचे पाले कधी कच्चे तर कधी शिजवून घेत असत. काही वेळा त्यात मीठ घालत, तर काही वेळा अगदी बिनमीठाचे सेवन करत. झाडांचा पाला हाच महाराजांच्या उपजीविकेचा आणि जीवनाचा आधार होता.

बालदास महाराजांनी तब्बल एकेचाळीस वर्षे अन्नाचा त्याग केला. शास्त्रानुसार मानवाला जीवनासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे व घटकद्रव्ये अन्नातून मिळणे गरजेचे मानले जाते. परंतु हा नियम प. पू. बालदास महाराजांना लागू पडला नाही. कारण बालदास महाराज हे प्रत्यक्ष परमेश्वरस्वरूप होते. एकेचाळीस वर्षे अन्नत्याग करूनही महाराज जगले—मग ते अलौकिक सामर्थ्यसंपन्न संत नव्हते काय?

सुमारे दहा ते बारा वर्षे महाराज अंथरुणावरच होते. त्या काळात त्यांची सेवा भक्तगण करीत असत. या दीर्घ कालावधीतही महाराजांनी अन्नाला कधीच स्पर्श केला नाही. त्यांची सेवा करणारे अनेक भक्त आजही जिवंत असून, त्यांचे अनुभव भाविकांनी ऐकण्यासारखे आहेत.

१९३५ साली अन्नत्यागाचा संकल्प केलेले महाराज १९७५ सालापर्यंत कसे जगले, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो. याचे उत्तर असे की येथे सर्व शास्त्रीय नियम अपुरे पडतात. ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला, त्यांनाच हे समजू शकते; ज्यांनी अनुभव घेतला नाही, त्यांना कदाचित हे कधीच उमगणार नाही. कदाचित येथे लिहिलेले सत्यही त्यांना अविश्वसनीय वाटेल. तरीही लिहिताना, माझ्या प्रामाणिकपणाशी कोणतीही तडजोड न करता, जे सत्य आहे तेच भक्तांसमोर आणि समाजासमोर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.