चरित्र

प. पू. योगीराज बालदास महाराजांचे जीवनत्व, त्याग, भक्ती आणि साधना-अभ्यासाची प्रेरणादायी कथा.
सत्यधर्म, सेवा, साधू परंपरेचा अभिमान आणि मानवतेची अनन्य शिकवण.

वर्तमान: प्रकरण ११: कापशीच्या मठातून महाराजांचे स्थलांतर

प्रकरण ११: कापशीच्या मठातून महाराजांचे स्थलांतर

"सर्वस्वाचा त्याग तो सदा मोकळा" (तु. म.)

कापशी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील मठाचे बांधकाम दासचंद महाराजांनी सुरू केले. त्या वेळी त्यांच्या समवेत बालदास महाराज व बंडू महाराज हे दोघेही होते. या तिघांमध्ये एकमेकांवर अपार बंधुभावाचे प्रेम होते. दासचंद महाराज बालदास महाराज व बंडू महाराज यांना वडीलबंधूप्रमाणे मानत असल्यामुळे त्यांनी जे सांगितले, ते बालदास महाराज मनापासून पाळत असत.

बालदास महाराज भिक्षा मागून आणत असत, तर दासचंद महाराज स्वयंपाकात व्यस्त असत. दासचंद महाराजांनी जितकी घरे भिक्षेसाठी सांगितली, तितकीच घरे बालदास महाराज मागून येत असत.

दासचंद बाबा, बंडू महाराज व बालदास महाराज हे तिघेही तब्बल तीस वर्षे एकत्र राहिले.

या तीस वर्षांच्या कालावधीत बालदास महाराजांनी अध्यात्मज्ञानाचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर भारतीय धार्मिक ग्रंथांचे व्यापक वाचनही केले. केवळ ग्रंथवाचनापुरतेच न थांबता, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य उभारण्याकडेही त्यांनी लक्ष दिले. याच कालखंडात कापशीच्या मठाच्या बांधकामाला वेग आला.

दासचंद महाराजांच्या आदेशानुसार कापशीच्या मठाचे संपूर्ण कामकाज बालदास महाराज पाहत होते. बालदास महाराज व बंडू महाराज या दोघांनी दासचंद बाबांचा शब्द प्रमाण मानून मठाचे बांधकाम जबाबदारीने सांभाळले. निधी संकलनापासून प्रत्यक्ष शारीरिक कष्टांपर्यंत सर्व कामे या दोघांनी निष्ठेने पार पाडली. या मठाच्या उभारणीत बंडू महाराज व बालदास महाराज यांचा वाटा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल.

बालदास महाराजांनी या मठासाठी घेतलेले परिश्रम अत्यंत मोलाचे होते. मठ पूर्ण झाल्यानंतर त्या तिघा गुरुबंधूंना जो आनंद झाला, तो शब्दांत मांडता येण्यासारखा नव्हता. एखादे महत्त्वाचे कार्य हातात घेऊन अनेक अडचणींवर मात करून ते पूर्ण झाल्यावर जो समाधानाचा आनंद मिळतो, तोच आनंद बालदास महाराजांना झाला.

कापशीचा मठ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कष्टांची माहिती बालदास महाराज आपल्या संगतीतील भक्तांना सांगत असत. मात्र म्हणतात ना—

“आले देवाजीच्या मना,
तेथे कोणाचे चालेना”

याच भावनेप्रमाणे बालदास महाराजांनी अखेरीस कापशीचा मठ सोडला.